मग मी मूर्ख कसा?

माझे सातवीपर्यंतचे शिक्षण पालिकांच्या शाळांत झाले.  शिक्षणाचे माध्यम मराठी व्यतिरिक्त अजून काही असू शकते, स्टेट बोर्ड व्यतिरिक्त अजून काही बोर्ड असतात वगैरे माहीत असायचा प्रश्न नव्हताच.  शाळा निवडताना घराच्या जवळ हा एकमेव निकष होता.  सावंतवाडीत, एल्फिन्स्टन रोडच्या घरी किंवा नंतर सांताक्रूझला आल्यावरही ह्याच निकषावर माझी शाळा निवडली गेली.  

त्या वेळी साधारण मध्यमवर्गीय लोक, ज्यांच्या घरी शिक्षणाचे वारे वाहात असे, असे लोक मुलांना खासगी शाळांत घालत.  त्यामुळे पालिकांच्या शाळेत बहुतांश निम्न मध्यमवर्गीयांची मुले येत.  बहुतेकांच्या घरी शिक्षणाचे वातावरण नसे.  मुलांनी अभ्यास सोडून इतर कसलीही पुस्तके वाचलेली नसत, तोंडची भाषा अशुद्ध असे, अभ्यासात फारशी गती नसे. अशा मुलांमध्ये माझ्यासारखे मोजके अपवाद, ज्यांच्या घरी शिक्षण हा महत्वाचा विषय असे, जे शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर अवांतर वाचन करीत असत ते वेगळे उठून दिसत.  वासरातल्या लंगड्या गायीच जणू!

सध्या पालिकांच्या शाळा कशा चालतात याबद्दल मला काही सांगता येणार नाही कारण तिथे शिकणारे कोणी परिचयात नाही.  पण तेव्हा पालिका शाळांत चांगले शिक्षण मिळत होते.  सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धेत मुलांना पाठवले जात होते. (तरीही चौथी व सातवीची शिष्यवृत्ती व चित्रकला परीक्षा मला माहित नव्हत्या.  चित्रकलेत माझा उजेडच होता पण शिष्यवृत्ती परिक्षेमुळे ज्ञान वाढले असते… आठवीत खाजगी शाळेत आल्यावर ह्या दोन परिक्षांविषयी कळले.  सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमूळे व्याकरण विषयात पीएचडी केलेले लोक आठवीत 'व्याकरण चालवा', 'शब्दाची रूपे सांगा' वगैरे जटिल प्रश्नांची धडाधड उत्तरे देत, त्यांना उत्तरे येतात म्हणजे पूर्ण वर्गाला विषय कळला असे शिक्षक मानत. आमच्यासारखे अज्ञ लोक व्याकरणाच्या तासाला शिक्षक व पीएचडी केलेले या दोघांच्याही तोंडाकडे टकामका पाहत बसू व परीक्षेत व्याकरणाच्या मार्कांवर पाणी सोडत असू. व्याकरणात मी कायमची कच्ची याचे खापर कोणी माझ्या डोक्यावर फोडू नये यासाठी हे सत्य इथे लिहून ठेवले. इत्यलम.)

तर पालिकेच्या शाळांमध्ये शिकत असताना मला मैदानी खेळांच्या स्पर्धेसाठी कोणी गांभीर्याने घेतले नसले तरी वक्तृत्व, निबंध, वाचन वगैरे स्पर्धेसाठी मला बरेच वेळा पुढे केले जाई. तेव्हा वाचनस्पर्धाही असायच्या.  मला बरीच वर्षे र चा उच्चार करता येत नव्हता, र च्या जागी मी ल उच्चारायचे.  पाचवीत माझ्या एक शिक्षिका अधून मधून माझ्याकडून मुद्दाम वर्गात काहीतरी उतारा वाचून घेत.  त्यांना र च्या जागी ल चा उच्चार खूप गोड वाटत असे.  पुढे मी प्रयत्नपूर्वक ही त्रुटी माझ्या वाणीतून काढून टाकली. तर असो.

कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर काही स्पर्धेत काहीतरी नंबरही यायचा.  बक्षीस म्हणून नेहमी पुस्तके मिळायची.  त्यामुळे मला हुरूप यायचा भाग घ्यायला.

अशाच एका स्पर्धेत एक पुस्तक मिळाले होते ज्यात संस्कृत श्लोक व त्यामागची गोष्ट अशा गोष्टी होत्या.  त्यात बहुतेक गोष्टी विसरले पण एक श्लोक लक्षात राहिला.  गोष्टीतला श्लोक कवी कालिदासाच्या नावावर खपवला होता पण प्रत्यक्षात तो त्याचा नाही हे हल्लीच त्या श्लोकाबद्दल वाचताना लक्षात आले.

गोष्ट अशी:

एकदा राजा भोज भोजनानंतरच्या दुपारी सहज म्हणून राणीच्या महालात जातो.  राणीकडे तिची मैत्रीण शिळोप्याच्या गप्पा किंवा हाई टी वगैरे काहीतरी कारणामुळे आलेली असते. 😊  दोघींच्या गप्पा रंगात आलेल्या असतात.  खोलीत शिरल्यावर राजाच्या हे लक्षात येते की राणीसोबत कोणीतरी आहे व  तो थबकतो.  पण कोणीतरी आत आल्याची चाहूल लागल्यामुळे मैत्रिणीचा रसभंग होऊन ती एकदम 'कोण तो मूर्ख आला मध्येच!' असे उद्गार काढते.

राजा एकदम चपापून मागे फिरतो.  मूर्ख, मूर्ख हेच शब्द त्याच्या डोक्यात घोळायला लागतात.  दुसरे दिवशी दरबारात सुद्धा त्याच्या डोक्यात तेच घोळत असते.  राजकवी समोर आल्यावर त्यालाही तो म्हणतो, या मूर्ख!.

कवी हजरजबाबी असतो.  तो त्वरित उद्गारतो, 

खादन्न गच्छामि हसन्न जल्पे
गतं न शोचामि कृतं न मन्ये ।
द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन्
किं कारणं भोज भवामि मूर्खः ॥



हे राजा भोज ! मी इकडेतिकडे फिरत खात नाही, उगीच हसत हसत बोलत नाही,  जे घडून गेले त्याचे दुःख करत बसत नाही, ना मी माझे यश सांगत फिरतो.  दोघे बोलत असताना मी मध्ये पडत नाही, मग मी मूर्ख कसा?

श्लोक ऐकल्यावर राजाच्या डोक्यात प्रकाश पडतो, त्याला मूर्ख का ठरवले गेले हे लक्षात येते व तो कवीला त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे धन देऊन त्याचे आभार मानतो.

हा श्लोक भोजराजाच्या दरबारी असलेल्या कवी माघ याने रचलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

जुने ते सोने

फाईकस लाइरटा Ficus lyrata

अडुळसा Justicia Adhatoda

बालपणीचा काळ सुखाचा.........